‘शालेय क्रिकेट हेच भारतीय क्रिकेटचे भवितव्य ’
सीसीआयच्या खेळपट्टीवर कपिल देव यांची चौफेर फटकेबाजी
मुंबई, २९ सप्टेंबर
कपिल पुढे म्हणाले की, विश्वचषक जिंकल्यानंतर जग संपत नाही, तिथेच प्रवासाला सुरुवात होते. भारताने विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम दाखवला. परंतु त्यानंतर किमान हा ऐतिहासिक आनंद साजरा करायलाही अवधी मिळाला नाही आणि पुन्हा चार दिवसांनी आयपीएल क्रिकेट सुरू झाले. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर हे फळ मिळाले होते. विश्वचषकानंतर किमान महिनाभर तरी देशात क्रिकेट खेळण्याची आवश्यकता नव्हती.
भारताचे क्रिकेटपटू आणि बोर्ड जगात सर्वात श्रीमंत आहे. अन्य देशांतील क्रिकेटपटूंना इतका पैसा मिळत नाही. भारतीय क्रिकेटची अर्थव्यवस्था पाहिली की गर्व वाटतो. अन्य खेळांनीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. शालेय क्रिकेट चांगले घडत राहिले, तर भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे, असे त्यांनी सांगितले.
बीसीसीआयचा मी आदर करतो. क्रिकेटपटूंसाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. माझा काही काळ बोर्डाशी बेबनाव झाला होता. परंतु आपले पालकांशीसुद्धा पटेनासे होतेच की.. असे कपिल देव यांनी यावेळी सांगितले.
गेल्या १५ वर्षांत भारतीय क्रिकेटने जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, झहीर खानसारखे अनेक चांगले वेगवान गोलंदाज घडवले आहेत. हे आणखी कसे घडवता येतील याचा बीसीसीआयने गांभीर्याने विचार करायला हवा. आताचे वेगवान गोलंदाज जिममध्ये धावतात, त्यांनी मैदानावर धावणे आवश्यक आहे, अशी कानउघाडणी कपिल यांनी केली.
वेगवान गोलंदाजांना सहा तास मेहनत घ्यावी लागते, ते कामगारासारखे राबतात. परंतु फलंदाजांना दोन तास कष्ट करावे लागतात, ते एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे वागतात. आपल्या देशात अधिकारी होण्यातच लोकांना जास्त रस आहे, हेच आपले दुर्दैव आहे, असे ते पुढे म्हणाले.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज दमले म्हणून चक्क कप्तान महेंद्रसिंग धोनीला यष्टिरक्षकाचे ग्लोव्हज काढून गोलंदाजी करायला लागली. हे योग्य धोरण नाही. मी असतो तर इशांत शर्मा आणि प्रवीण कुमारला तुम्ही दमलात का, असे अजिबात विचारले नसते. त्यांना २५ षटके सहज गोलंदाजी करायला लावली असती, असे कपिल यांनी सांगितले.
निवड समिती सध्या विभागीय पद्धतीने कार्यरत आहे. तीन-चार प्रमुख खेळाडूंचा समावेश आणि त्यांच्यासमवेत १० अन्य सदस्य अशी निवड समितीची रचना हवी. या सदस्यांनी स्थानिक क्रिकेट बारकाईने जाऊन पाहणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
देश आणि आयपीएल क्लब या वादाबाबत कपिल देव यांनी भूमिका मांडताना सांगितले की, या दोन्ही गोष्टी एकाच संघटनेच्या अखत्यारित येतात. मग दोन्हीमधून मिळणाऱ्या पैशांमध्ये फरक का? एखादी संघटना क्लबसाठी खेळताना देशासाठी खेळण्यापेक्षा अधिक पैसे कसे काय देऊ शकते. मला तरी हे मान्य नाही.