उत्तरप्रदेशात ‘सायकल’ राज सुरू
लखनौ - समाजवादी पार्टीचे पुनरूज्जीवन करून पक्षाला एकहाती सत्ता प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे अखिलेश यादव यांनी आज उत्तरप्रदेशचे ३३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या आजवरच्या इतिहासातील ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत १९ कॅबिनेट दर्जाच्या आणि २८ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आधार घेऊन अखिलेश यांनी डी. पी. यादव यांना उमेदवारी नाकारली होती. पण, त्यांनी आज आपल्या मंत्रिमंडळात आठ गंभीर गुन्हे असलेल्या रघुराज प्रताप सिंग उर्ङ्ग राजा भय्या यांना सहभागी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील ला मार्टिनीअर महाविद्यालयाच्या प्रांगणात हा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात राज्यपाल बी. एल. जाशी यांनी अखिलेश यादव आणि ४७ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, अखिलेश यांची पत्नी डिम्पल, केंद्रीय मंत्री पवनकुमार बन्सल, कॉंगे्रसचे नेते मोतिलाल व्होरा, जया बच्चन, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौटाला, माकपचे सरचिटणीस प्रकाश कारत, भाकपचे नेते ए. बी. बर्धन आणि उद्योगपती अनिल अंबानी व सुब्रता रॉय उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री आणि बसपा नेत्या मायावती या समारंभात उपस्थित नसल्या, तरी त्यांच्यावतीने माजी मंत्री नसिमुद्दिन सिद्दिकी आणि स्वामी प्रसाद मौर्य उपस्थित राहिले होते. शपथविधीनंतर आपल्या पहिल्याच पत्रपरिषदेला संबोधित करताना, अखिलेश यादव यांनी राजा भय्या यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. राजा भय्या यांच्यावर दाखल झालेले गुन्हे कोणत्या काळातले आहेत आणि कोणाची सत्ता असताना ते दाखल करण्यात आले आहे, याचा जर तुम्ही अभ्यास कराल, तर यामागे कुणाचा हात आहे, हेदेखील लक्षात येईल, असे त्यांनी सांंगितले. सपाने आपल्या जाहिरनाम्यात दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता करणे आणि राज्याची विस्कटलेली घडी नीट बसविणे हेच आपले प्राधान्य आहे, असे स्पष्ट करताना, त्यांनी मायावती सरकारवर टीका केली. या सरकारने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा ङ्गटका बसला आहे. मायावती यांच्या सरकारमधील प्रत्येक मंत्र्याने आपली घरे भरली. त्यांनी संघटितपणेच भ्रष्टाचार केला, असा आरोप त्यांनी केला.
